10वी-12वीत 90%गुण मिळवलेल्यांचा गौरव – नगराध्यक्ष शैलेंद्रदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान..!
शेगाव / विशेष प्रतिनिधी
पत्रकारिता क्षेत्रात जनसेवेचा वसा घेतलेल्या पत्रकारांच्या पाल्यांनी एसएससी व एचएससी परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यासाठी “गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ” आयोजित करण्यात आला आहे. समाजाला दिशा देणाऱ्या पत्रकारांच्या घरातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर मिळवले यश हे समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
हा सत्कार समारंभ 25 जून 2026, गुरुवार रोजी सकाळी 10.00 वाजता श्री यादव बेकर्स, वरवट रोड, शेगांव येथे उत्साहात पार पडणार आहे.
या समारंभाला शेगाव नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष श्री शैलेन्द्रदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. नगर परिषदेचे बांधकाम सभापती श्री अंकुशबापु देशमुख व शिवसेना शेगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष श्री रामाभाऊ थारकर यांची विशेष उपस्थिती असेल. त्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला अधिक गौरव प्राप्त होणार आहे.
दिवसरात्र शाईच्या दुनियेत राबणाऱ्या पत्रकारांच्या मुलांनी दहावी-बारावीच्या परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण मिळवून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. कलमाच्या वारसांनी पेनच्या जोरावर नाव कमावल्याचे हे दर्शन आहे. त्यामुळे “व्हाईस ऑफ मिडिया शेगांव शहर व तालुका” तसेच “युवा क्रांती संघटना शेगांव” यांनी संयुक्तपणे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचे ठरवले आहे.
सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय गुणवंत विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करणार असून, त्यांच्या यशस्वी प्रवासातील कष्ट, शिस्त व पालकांचे मार्गदर्शन यावर प्रकाश टाकणार आहेत. पत्रकार बांधव आपल्या पाल्यांच्या यशाने आनंदित झाले असून, या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
आयोजकांनी शेगाव शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव, शिक्षक, पालक व नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आयोजकांचे म्हणणे आहे की, “आपली उपस्थिती या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला अधिक गौरवशाली ठरवेल आणि पुढील पिढीला प्रेरणा देईल.”
शाईतून पेनकडे – पत्रकारितेचा वारसा पुढे..!
वृत्तपत्राची शाई ज्यांच्या हाताला लागली आहे, त्याच घरातील मुलांनी मार्कशीटवर शाई पाजली आहे. 10वी-12वीच्या निकालात चमकणारे हे विद्यार्थी म्हणजे “ज्ञानाचा वारसा” आहेत. जिथे वडिलांनी समाजाला जागे केले, तिथे मुलांनी स्वतःच्या अभ्यासाने समाजाला प्रेरणा दिली. या सत्कार सोहळ्यातून एक संदेश स्पष्ट होतो – “कलमाची धार आणि पेनाची धार” एकाच घरातून येते. बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकार कुटुंबांनी हे सिद्ध केले आहे की, जनसेवेसोबत शिक्षणालाही तितकेच महत्त्व आहे. येणाऱ्या काळात हे विद्यार्थी उच्च शिक्षणातही अशीच भरारी घेतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

