नागझरी टाकळी : नागझरी टाकळी गावातील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी पाण्याची डबकी साचली आहेत. विशेषतः मूल्याच्या शाळेजवळील रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येकडे अनेक दिवसांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. ग्रामस्थांनी संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित दखल घेऊन आवश्यक कामे हाती घ्यावीत, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

