
सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना अमली पदार्थ म्हणजे काय, व्यसन कसे जडते, अमली पदार्थांचे विविध प्रकार, त्यांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अमली पदार्थ तस्करीच्या घटनांमध्ये विद्यार्थ्यांचा आढळून आलेला सहभाग, अशा प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य कशा प्रकारे उद्ध्वस्त होऊ शकते याबाबत उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांची तस्करी, विक्री अथवा संशयास्पद हालचाली आढळून आल्यास तात्काळ नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या हेल्पलाईन क्रमांक १९३३ वर माहिती द्यावी, तसेच व्यसनमुक्तीसाठी राष्ट्रीय रिहॅबिलिटेशन टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक १४४४६ चा उपयोग करण्याबाबत माहिती देण्यात आली.
याशिवाय अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून दहशतवादी संघटनांना आर्थिक पाठबळ मिळते, त्यामुळे हा विषय केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरता मर्यादित नसून देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित अत्यंत गंभीर विषय आहे, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच ऑनलाईन गेमिंग, सोशल मीडिया, फेक न्यूज, कट्टरतावादी प्रचार (Radicalization) व डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चुकीच्या विचारसरणीकडे आकर्षित करण्याचे वाढते प्रकार याबाबत जागरूक करण्यात आले.
सायबर जनजागृती सत्रामध्ये विद्यार्थ्यांना सायबर स्पेस व सायबर सुरक्षेची संकल्पना, मजबूत पासवर्डचा वापर, OTP व बँकिंग माहिती कोणालाही न देणे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाईन गेमिंगमधील आर्थिक फसवणूक, फिशिंग लिंक, QR कोड फसवणूक, बनावट मोबाईल अॅप्स, सायबर बुलिंग, डिजिटल अटक (Digital Arrest) फसवणूक, AI-आधारित फसवणूक (Deepfake), तसेच सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधणे व www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सध्याच्या काळात वाढते अमली पदार्थांचे जाळे, सोशल मीडियाद्वारे होणारी दिशाभूल, सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि विद्यार्थ्यांना लक्ष्य करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्ती लक्षात घेता अशा जनजागृती कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी योग्य वेळी जागरूक राहून स्वतःचे, कुटुंबाचे आणि राष्ट्राचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
रेल्वे पोलीस प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच समाजातील युवक व विद्यार्थ्यांना गुन्हेगारी, अमली पदार्थांचे व्यसन, सायबर फसवणूक आणि कट्टरतेच्या विळख्यातून वाचविण्यासाठी सातत्याने जनजागृती उपक्रम राबवत असून, अशा सामाजिक उपक्रमांद्वारे सुरक्षित, सजग व जबाबदार नागरिक घडविण्यासाठी रेल्वे पोलीस कटिबद्ध आहेत.
सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात, पोलीस हवालदार किरण आघाव व पोलीस शिपाई ३०५ ऋषिकेश जवळकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडला.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर, हेमलता मॅडम व इतर शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

